N. D. Mahanor
रानातल्या कविता’ ह्या पहिल्याच संग्रहातील निसर्गकवितेने वाचकांच्या मनाला भुरळ पाडली आणि मराठीतील आजची निसर्गकविता म्हणजे महानोर असे समीकरण निर्माण झाले. तरीही महानोरांनी आपली कविता अनेक अंगांनी फुलविली आहे. ’वही’ हा संग्रहात त्यांनी मराठवाड्यातील लावणी प्रभावी रीत्या कवितेत आणली. ’पळसखेडची गाणी’च्या निमित्ताने त्यांनी स्त्री-गीते आणि लोकगीते आत्मसात केली.’अजिंठा’ हे महानोरांचे खंडकाव्य, यातील कथनशैली लोभावणारी आहेच, शिवाय त्यातील ’लिरिकल’ गोडवाही कायम राहिला आहे. ’प्रार्थना दयाघना’तील दीर्घकवितेत सामाजिक आशयाची कविता आढळून येईल.गेल्या काही वर्षांत महानोरांच्या कवितेचा चित्रपटांत समर्थपणे उपयोग करण्यात आला आहे. यातील ’जैत रे जैत’मधली गाणी पूर्वीच्या संग्रहांतून प्रसिद्ध झालेली आहेत. त्यानंतरची गाजलेली गीते ’पानझड मधे समाविष्ट आहेत.’पानझड मधे कवीला आलेल्या काही उदासवाण्या अनुभवापासून सुरुवात होते. त्यानंतर गीतांच्या वळणाच्या कविता एकत्रित केल्या आहेत. शेवटी देण्यात आलेल्या ’पालखीचे अभंग’ या विभागात एक वेगळेच महानोर दिसतील.